ठळक घडामोडी

राजकीय रणधुमाळी! तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात “बाहेरील उमेदवारांना” स्थानिक कार्यकर्त्यांचा ठाम विरोध!खुल्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ, पण स्थानिकांनी घेतली आक्रमक भूमिका! तळवडे मतदार संघातील स्थानिक भाजप व शिंदे शिवसेना पक्षांतील दिग्गज नेते रिंगणात

राजकीय रणधुमाळी!

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात “बाहेरील उमेदवारांना” स्थानिक कार्यकर्त्यांचा ठाम विरोध
खुल्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ, पण स्थानिकांनी घेतली आक्रमक भूमिका

 आम्ही एवढे वर्ष पक्षाचे काम करून फायदा काय ?आम्हाला कधी संधी मिळणारं !माजी सरपंच प्रमोद गावडे 

रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघात खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे, अन्य राखीव मतदारसंघातील काही मातब्बर नेते आता तळवडे मतदार संघावर लक्ष केंद्रित करत असल्याची माहिती समोर येताच, स्थानिक कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. भाजपचे तळवडे मतदार संघातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती प्रियांका प्रमोद गावडे यांचे पती प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, तसेच रत्नदुर्ग कात उत्पादक संघटनेचे अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव हे सध्या जिल्हा परिषद उमेदवारी करता इच्छुक आहेत. यावेळी माजी सरपंच प्रमोद गावडे म्हणाले आम्ही एवढे वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम केले आम्हाला संधी कधी मिळणार असा सवाल केला आहे.तर शिंदे शिवसेना पक्ष कडून जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, आमदार दिपक केसरकर याचे विश्वासू कार्यकर्ते सूरज परब हे सध्या रेस मध्ये  आहेत या नेतेमंडळी शिवाय अजून काही कार्यकर्ते तळवडे, नेमळे, मळगाव या गावातून इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. 

तळवडे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी “बाहेरील उमेदवार नकोच” अशी  भूमिका घेतली आहे. “कोणी कितीही दबाव आणला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत बाहेरील उमेदवार स्वीकारणार नाही,” असा ठाम पवित्रा घेत स्थानिक नेत्यांनी पक्षातील गटबाजीचे सूरही तीव्र केले आहेत. “आमच्याकडे सक्षम, अनुभवी कार्यकर्ते असताना बाहेरील व्यक्तीला संधी का?” असा स्पष्ट सवाल करत, स्थानिक विरुद्ध बाहेरील नेते असा संघर्ष या मतदारसंघात उफाळून येण्याची चिन्हे आहेत. “बाहेरचा उमेदवार आणल्यास आम्ही निष्क्रिय बसणार नाही,” असा थेट इशारा काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी  दिल्याची माहिती आहे.

खुल्या आरक्षणामुळ वाढली चढाओढ-
 
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी पडल्यामुळे,तळवडे यांसारख्या खुल्या झालेल्या मतदारसंघांत इच्छुकांच्या चाचपणी आणि बैठकांचा जोर वाढला आहे. याच संधीचा फायदा घेऊन मूळ मतदारसंघ आरक्षित झालेले नेते तळवडेवर ‘लक्ष’ ठेवून आहेत, ज्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
केवळ कार्यकर्तेच नव्हे, तर स्थानिक नागरिकही स्थानिक उमेदवाराच्या बाजूने उभे राहिले आहेत. “स्थानिक समस्यांची जाण असलेला आणि लोकांशी नातं जपलेला उमेदवारच प्रभावी ठरू शकतो,” असा विश्वास व्यक्त करत जनतेनेही स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.
 
या घडामोडींमुळे संबंधित पक्षाच्या जिल्हा नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एका बाजूला वरिष्ठ नेते “जिंकणारा उमेदवार” म्हणून बाहेरील मातब्बर नेत्यांचा विचार करत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक संघटना “आपला माणूस” या भूमिकेवर ठाम आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून संघटना उभी केली आणि आता या तयार पायाभूत कामावर बाहेरील उमेदवार लादणे अन्यायकारक ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे. “आमचं क्षेत्र, आमचा उमेदवार” या भूमिकेमुळे पक्षनेतृत्वास आता समन्वयाचा कठीण पेच सोडवावा लागणार आहे.