सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी केल्यानंतर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बाधितांना मोठा दिलासा दिला आहे. “हे संकट मोठे आहे, त्यामुळे केवळ शासकीय निकषांवर न थांबता, प्रसंगी चौकटीबाहेर जाऊन जनतेला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देऊ,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
६१ ठिकाणी मोठे नुकसान, पंचनाम्यांचे आदेश
तालुक्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि रामेश्वर प्लाझा परिसरातील पडझडीची प्रत्यक्ष पाहणी केली. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यात सुमारे ६१ ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा
- पूर नियंत्रण: नद्यांमधील गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, यावर्षीही पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
- वीज समस्या: महावितरणच्या कामात सुधारणा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठा निधी मिळाला असून, वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाईल.
- आपत्ती व्यवस्थापन: धोकादायक झाडे हटवण्यासाठी आणि आपत्ती काळात मदतीसाठी विशेष टीम तैनात करण्यात आली आहे.
शक्तीपीठ महामार्गाबाबत संभ्रम दूर
शक्तीपीठ महामार्गावर भाष्य करताना राणे म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनांनुसार नवीन मार्ग निश्चित केला आहे. यामुळे बांदा शहर किंवा गावे बाधित होणार नाहीत. उलट, हा मार्ग रेडी पोर्टला जोडला गेल्याने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. “सरकार अफवांवर नाही, तर विकासाच्या धोरणावर चालते,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी एमडी फिजिशियनची नियुक्ती करण्यात आली असून, जून महिन्यापर्यंत आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरली जातील, अशी महत्त्वाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या पाहणी दौऱ्यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवराज लखमराजे भोसले, तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








