सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील सुमारे १५ ते १६ गावे अद्याप वेंगुर्ला महावितरण विभागाशी जोडलेली असल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तक्रारींसाठी सावंतवाडीतून वेंगुर्ल्यापर्यंत करावा लागणारा प्रवास आणि अनेक दिवस अंधारात राहण्याची वेळ याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी आठ दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मळेवाड येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. राऊळ म्हणाले की, पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यातील अनेक भागांत वीजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सातार्डा, आरोंदा आदी गावांसह अनेक गावांचा वीजपुरवठा वेंगुर्ला महावितरण विभागाशी जोडलेला असल्याने वीज तक्रारींसाठी नागरिकांना सावंतवाडीतून पुन्हा वेंगुर्ल्यात जावे लागते. याचा सर्वाधिक फटका गोरगरीब आणि ग्रामीण भागातील जनतेला बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
वीजप्रश्नाबाबत यापूर्वी निवेदने, आंदोलने तसेच देवासमोर आरती करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. “आमचा संयम आता संपला असून आठ दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मळेवाड येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी तालुक्यातील विकासकामांवरही टीका केली. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागत असताना विकासकामे मात्र दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना, “आमच्या सत्ताकाळात वेत्ये येथे रुग्णालयासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी होती. मात्र आजही केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात काहीच झालेले नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. “माझी कुंडली काढण्यापेक्षा संजू परब यांनी ज्योतिषाचे दुकानच सुरू करावे. त्यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. आडाळी येथील माती उत्खनन प्रकरणावर त्यांनी केलेल्या आरोपांबाबत ठोस स्पष्टीकरण देण्यास त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाहीत,” असा पलटवार श्री. राऊळ यांनी केला.
या पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, अशोक परब, अशोक धुरी, सुरेश गावडे, राजू शेटकर, गुरु नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







